“जन पळभर म्हणतील हाय हाय.. मी जाता राहीन कार्य काय..”मलाही त्या दिवसाची खूप उत्कंठा लागलेली.. १९ फेब्रुवारी चा दिवस उजाडला.. आज कार्यक्रम आहे हा विचार मनात आल्याबरोबर मी मनाने तर केव्हाच तिथे पोहोचले होते.. कार्यक्रमाच्या स्वरूपाचे मनोरे बांधणं चालू होतं.. भराभर आवरून मी, माझी बहिण आणि आई आम्ही तिघी भातसानगरच्या प्रवासाला लागलो.. जेव्हा भातसानगर ला जाणारा फाटा लागला.. तेव्हा गाडीतून बाहेर बघताना दिसणाऱ्या एकेका झाडागणिक आठवणी ताज्या होत गेल्या.. प्रत्येक जागा.. प्रत्येक ठिकाण काहीना काही ओळखीची खुण सांगत होतं.. जुन्या आठवणीत रमताना अगदी हरवून गेल्यासारखं झालेलं.. अश्यातच शाळेचं प्रवेशद्वार आलं.. “प्रकल्प विद्यालय भातसानगर” आम्ही गाडीतून उतरलो.. कमानीवर लावलेल्या फलकांनी आमचं स्वागत केलंच होतं.. गेटमधून आत जाताना अनेक ओळखीचे चेहरे समोरून येऊ-जाऊ लागले.. आम्ही नावं नोंदवली तेव्हा एक गुलाब-पुष्प, प्रमाणपत्र आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन आमचं स्वागत झालं.. आणि मग गतस्मृतींना उजाळा देऊन माणसं आठवून त्यांच्याशी बोलून आठवणींना उजाळा देणं सुरु झालं.. काहींचे चेहरे आठवत.. पण नावं आठवत नव्हती.. तरी सगळ्यांना माझी ओळख सांगत.. त्यांची ओळख पटवत भेटी घेत गेले.. ३०-३२ वर्षांनतर वर्गमित्र भेटल्याचा आनंद काही औरच.. आम्ही सगळे एकमेकांना अगदी, अरे तू किती जाड झालास.. झालीस.. केस पिकले की, सुना-जावई आले का..? मुलं काय करतात.. अशी औपचारिक विचारपूस करून एकमेकांची चेष्टामस्करी करणंही सुरूच होतं.. कोण-कोण आलंय.. अन् कोण कोण नाही हे पाहण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही.. त्यातंच आम्ही क्रीडामंदिर’ला चालत आलो.. रस्त्याच्या त्या ओळखीच्या खुणा.. त्या घटना.. मनात दाटी करत होत्या.. किती आठवू.. किती पाहू.. किती फोटो काढू न किती काय.. असं झालं होतं..
लेख खूप सुंदर होता आपण स्वतः सर्व काही तिथे अनुभवत आहे असच वाटत . तुम्ही अशाच लिहित रहा. पुढील लिखानास हार्दिक शुभेच्छा..