गगण ठेंगणे- आशिष तांबे

अक्षर गणेश एक पाऊल, कलेतून जाणिवेकडे

३ वर्षांपूर्वी अक्षर गणेशाच्या रूपाने बाप्पा त्याच्या आयुष्यात आला.. आणि त्याचं आयुष्याच बदलून गेलं.. त्याने सचिन पिळगावकर यांना पहिली अक्षर गणेश कलाकृती भेट दिली आणि त्यानंतर नावांतून बाप्पाच्या दर्शनाचा हा खटाटोप सुरू झाला..!!

आशिष म्हणतो.. “बाप्पा चराचरात निवास करतो.. तसाच तो अक्षरांमध्येही असतो.. प्रत्येक एका स्वतंत्र अक्षरातून बाप्पाच्या रूपाचे.. अंशाचे दर्शन होत असते..!!” कोणतीही भाषा असो.. प्रत्येक भाषेतील अक्षरातून.. शब्दांतून.. आणि नावांतून त्याच्या कुंचल्याआडून बाप्पा सहज डोकावू पाहतो.. आपली कला लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्याने फेसबुक सारख्या सोशल नेट्वर्किंग साईटचं माध्यम निवडलं.. याच फेसबुक मुळे आशिष हजारो लोकांना माहित झाला.. त्याचा मित्रसमूह वाढला आणि स्वतःचा वेगळा असा चाहतावर्ग तयार झाला.. भारतात आणि भारताबाहेरही त्याच्या कलाकृतींना मागणी आली..

त्याने आजतागायत मराठी चित्रपट सृष्टीतल्या त्याच्या आवडत्या आणि कित्येक हरहुन्नरी कलावंतांना अक्षर गणेश कलाकृती सदिच्छा भेट म्हणून दिली आहे.. नाना पाटेकर, अवधूत गुप्ते, स्वप्नील जोशी, मुक्ता  बर्वे, आणि अजून कित्येक.. तसेच राजकीय क्षेत्रातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देखील त्याने अक्षर गणेश कलाकृती भेट म्हणून दिली आहे.. आशिषने आत्तापर्यंत मुंबईमध्ये अक्षर गणेशाच्या ५ कार्यशाळा पार पडल्या आहेत.. त्याच्या या कार्यशाळांना देखील भरघोस प्रतिसाद मिळाला..

या सगळ्यात महाराष्ट्रातला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे प्रश्न त्याच्या मनाला सारखे भेडसावत होते.. आपल्या कलेचा उपयोग समाजाला झाला नाही तर मग आपली कला व्यर्थच आहे.. असं त्याचं म्हणनं होतं.. त्याला अगदी मनापासून काहीतरी करावसं वाटत होतं.. पण काय..

या बद्दल आशिष सांगतो, “मला माझ्या कलेच्या माध्यमातून निधी गोळा करून तो शेतकऱ्यांना द्यायचा आहे’ अश्या आशयाचा एक मेसेज तयार करून मी तो माझ्या काही जवळच्या मित्रांना पाठवला आणि माझा दिग्दर्शक मित्र अभिषेक करंगुटकर (वाटा, वाशाहीर) याने या उपक्रमात सोबत येण्याचं ठरवलं..

अभी-अवनी च्या Whale Wishers Studiosच्या माध्यमातून या उपक्रमाबद्दल व्हॉट्सअॅप-फेसबुक वर प्रसिद्धी सुरू झाली.. जेणेकरून लोक येतील आणि भरघोस रक्कम गोळा करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता येईल.. यातला एकही रुपया आपल्या खिशात जाणार नाही याची खबरदारी आशिषने घेतली.. आणि अक्षर गणेश एक पाऊल, कलेतून जाणिवेकडे या उपक्रमाचा शुभारंभ झाला, लालबागच्या राजाच्या पाद्यपूजनाने.. अक्षर गणेशाची विक्री करून त्यातून निधी जमा करायचा असं ठरलं.. किंमतही अगदीच वाजवी ठेवली.. ५० ते १०० रुपये..

शेकडो लोकांनी या उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतला.. अनेकांनी स्वतःहून देणग्या दिल्या.. काही तर गुजरात-सुरत वरून खास या उपक्रमासाठी आले होते.. दैनिक वृत्तपत्रांतून या उपक्रमाची बातमी छापून आली.. अनेकांनी स्वतःच्या विभागात हा कार्यक्रम राबवायची इच्छा देखील दर्शवली.. आणि त्याचबरोबर सुरु झाला एक अखंड प्रवास..

आशिषला त्याच्या या उपक्रमाबद्दल विचारल्यावर तो म्हणाला.. “मला माझ्या शेतकरी बांधवांनी माणूस म्हणून जगायला हवं आहे.. महाराष्ट्रातला दुष्काळ मला माझ्या ओंजळीने भरून काढायचाय.. आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची मदत लागणार आहे.. मान्य आहे, माझा वाटा अगदीच छोटा आहे पण तरीही मला माझ्या कर्तव्याची जाण  आहे.. आणि म्हणून टाकलेलं हे पाउल.. आज शब्दीप्ताच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या सोबत येण्याचं आवाहन करतो.. तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हा.. माझ्या हातात हात देऊन सोबत चला.. कारण शेतकऱ्यांसाठी आपण केलेली ही फक्त मदत नाही.. तर आपलं कर्तव्य आहे.. मला तुमची सोबत हवीये.. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू शकू..!!

आशिषच्या अक्षर गणेश एक पाऊल, कलेतून जाणिवेकडे या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या नावात वसलेले बाप्पा अनुभवण्यासाठी.. आपल्या शेतकरी बांधवांना सुखाचा घास भरवण्यासाठी.. आणि महाराष्ट्रातला भीषण दुष्काळ भरून काढण्यासाठी, आपली एक ओंजळ टाकण्याकरिता संपर्क साधा..

आशिष तांबे ९८२१८५३५७२                              

-टीम शब्दीप्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *