शब्दीप्ता of the issue- रत्नाकर मतकरी

मतकरींची गुढकथा हि त्यांच्या लिखाणाची एक जमेची बाजू.. त्यांच्या लिखाणाचं वर्णन वाचताना वाचक त्याचं बोट धरून कधी त्या संपूर्ण वातावरणात जातो.. त्याचं त्यालाच कळंत नाही.. गूढ, अनवट आणि भयप्रद धाटणीचं लिखाण करणं हा मतकरींचा छंदच जणू.. कारण त्यांनी त्यांच्या एकूणच लेखन साहित्यात सर्व प्रकारच्या साहित्याची निर्मिती केलेली दिसून येते.. पण गूढ कथा हा बाज त्यांना चांगलाच जमून गेल्याचं दिसतं.. एकांकिकेने आपल्या लेखनाला प्रारंभ करणाऱ्या मतकरींना गूढकथेचा वेध लागला..

रहस्यमयता आणि नाट्यमयता हे मतकरींच्या लेखन प्रतिभेचे पैलू आहेत.. मतकरींनी परीकथाही लिहिल्यात.. आणि भयकथाही.. दोन्हीमध्ये अकल्पित गोष्टी घडतात हे साम्य आहे.. परीकथांमधून त्या वर्णनाची गोड-गोड बाजू दिसते तर गूढकथांमधून अतिमानुष..

१९५५ साली मतकरींची वेडी माणसं हि एकांकिका आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावरून प्रथम प्रसारित झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला.. त्यांची कारकीर्द बहारतेच आहे.. त्यांनी आजतागायत रंगभूमी, चित्रपट क्षेत्र, TV जगत या संपन्न क्षेत्रांमध्ये.. लेखक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, या आणि अश्या अनेक भूमिका पार पडल्या आहेत.. एक उत्तम लेखक असण्याबरोबरच ते एक उत्तम  चित्रकारही आहेत..

त्यांनी पत्नी प्रतिभाच्या मदतीने काही नाट्यसंस्थाही स्थापन केल्या आहेत.. ‘बालनाट्य’ ‘सूत्रधार’ आणि ‘महाद्वार’.. त्यांनी या संस्थांच्या मदतीने आजवर अनेक नाटकांची निर्मिती केली आहे..

मानवी मनाचे कंगोरे मतकरींना वेधकतेने पकडता आले.. त्यामुळेच त्यांना नाटक, एकांकिका, कथा, कादंबरी, चित्रपट-कथा, परीकथा, आणि गूढकथा.. या सगळ्याच माध्यमातून लोकप्रिय ठरण्यात यश आल्याचं दिसतं..

मतकरींच्या गूढ कथांमधून जीवनाचे आणि मानवी मनाचे सखोल, अर्थपूर्ण आणि समृद्ध दर्शन घडत राहते.. मतकरी एका गूढ, भयप्रद, अद्भुत वातावरणात घेऊन जातात.. आणि त्या वर्णनाने मंतरल्यागत वाचक पानांमागून पाने उलटत जातो.. जेव्हा शेवटचा पूर्णविराम येतो तेव्हा भानावर आलेला वाचक पुन्हा मागे वळून त्या संपूर्ण वर्णनाकडे डोळे भरून पाहिल्यावाचून राहत नाही..

-टिम शब्दीप्ता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *